Ad will apear here
Next
‘कुतूहल हरवता कामा नये’
‘सिंफनी - पाश्चात्य संगीताची सुरेल सफर’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) आशिष पाटकर, दीपा देशमुख, अच्युत गोडबोले, कौशल इनामदार आणि अरविंद पाटकर

पुणे : ‘अनेक विषयांचे मला प्रचंड कुतूहल वाटते. त्यात मी झोकून देतो. तो अभ्यास पुस्तकाच्या रूपाने लोकांसमोर आणतो. साठच्या दशकात मी बंडखोरीचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ऐकले. पाश्चात्त्य संस्कृतीविषयी पुस्तके लिहिताना तिथल्या संगीताविषयी लिहायचे ठरवले होते. त्यामुळेच ‘सिंफनी - पाश्चात्य संगीताची सुरेल सफर’ हे पुस्तक लिहिले. आज आपण कुतूहल हरवत चाललो आहोत, हे आपले दुर्भाग्य आहे. विषयांवर प्रेम करायला पाहिजे. विषयातील सौंदर्य शोधायला हवे. विषयातील मूलतत्त्वे आपल्याला कळली पाहिजेत आणि त्याचा सातत्याने ध्यास घेतला पाहिजे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांनी केले. त्यांनी आणि दीपा देशमुख यांनी लिहिलेल्या ‘सिंफनी’ या पुस्तकाचे प्रकाशन २१ जुलै २०१८ रोजी पुण्यात संगीतकार कौशल इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी ते बोलत होते. मनोविकास प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या वेळी मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर उपस्थित होते.

गोडबोले म्हणाले, ‘ज्या विषयातील मला कळत नाही, त्या विषयात मी घुसतो. शाळेत असल्यापासून मला कुतूहल वाटणाऱ्या विषयाचा अभ्यास करायला आवडायचे. ‘आयआयटी’त शिकत असताना बीटल्सचे संगीत ऐकले. त्याने गारूडच केले. नोकरीनिमित्त युरोप, अमेरिकेत फिरत असताना मोझार्ट, बीथोवन अशा महान संगीतकारांचे संगीत ऐकले. आपले शास्त्रीय संगीतही खूप ऐकले. पाश्चात्य संगीत हा त्या संस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. तो लिहायचा राहिला होता. त्यामुळे त्याचा अलौकिक इतिहास लोकांसमोर आणण्यासाठी हे पुस्तक लिहिले.’

‘आपण जे गाणे ऐकतो ते आपल्याला कळले पाहिजे असे अनेकांना वाटत असते. मला वाटते गाणे कळणे हाच मुळात वेडेपणा आहे. गाणे अनुभवणे, त्याचा आस्वाद घेणे, त्यातील भाव कळणे हे जास्त महत्त्वाचे आहे,’ असे मतही गोडबोले यांनी मांले.

दीपा देशमुख म्हणाल्या, ‘पाश्चात्य संगीताचा इतिहास पुस्तकात यावा, यासाठी सर्व काळांचा आढावा त्यात घेतला आहे. पाश्चात्य संगीताची ओळख ज्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, अशा चार महान संगीतकारांचे चरित्र लिहिताना खूप काही शिकायला मिळाले. संघर्ष करत असताना काही आधार नसतानादेखील निराश होऊ नये, हे या संगीतकारांनी शिकवले. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे यात लेख असलेल्या महान संगीतकारांच्या सिंफनींचे क्यूआर कोड देण्यात आले आहेत. त्यामुळे पुस्तक वाचताना क्यूआर कोड स्कॅन केला, तर त्या संगीतकारांची सिंफनी मोबाइलवर ऐकता येऊ शकते. पाश्चात्य संगीतावरून प्रेरित होऊन भारतीय संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या तब्बल १५० गाण्यांची यादीही पुस्तकात दिली आहे.’

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले संगीतकार कौशल इनामदार म्हणाले, ‘पाश्चात्य संगीतावर साधे, सहज लिहिलेले हे पुस्तक आहे. एखादा विषय, कविता पूर्ण कळली, असे कधी नसतेच. ती एक अखंड चालत राहणारी प्रक्रिया आहे. तसे हे पुस्तक वाचून संपवण्यासारखे नाही. अत्यंत रंजक माहिती यात आहे. गोष्टीतून इतिहास, संगीत शिकण्यास मदत होते. ते काम हे पुस्तक करते. सूर किंवा संगीताला संस्कृती चिकटलेली असते. पाश्चात्य संगीताचीही संस्कृती यातून वाचायला मिळते. संगीताला कोणतीही भाषा नसते असे म्हणतात; मात्र याच संगीताच्या शब्दांमधून सूर नाही तर संस्कृती झिरपत असते. त्यामुळे ती समजून घेण्यासाठी कुतूहलाने संगीत ऐकावे. गोडबोलेंना वाटणारे कुतुहल इतक्या उच्च दर्जाचे आहे, की त्यातून अनेकांचे आयुष्य बदलू शकते. मराठी माणसेच असे काही नवीन करण्यात उत्साही असतात.’

‘आपल्याकडे संगीतात विनाकारण गोष्टी गुंतागुंतीच्या करण्याची सवय आहे. मराठी संगीतकार एकाच गीतातील चार वेगवेगळ्या कडव्यांना चार वेगवेगळ्या चाली देतो. तो एका चालीवर कधीच समाधानी रहात नाही. याचे कारण म्हणजे त्या संगीतकाराच्या मनात संशोधक दडलेला असतो. ज्येष्ठ नेहमी सांगतात, की कविता समजली तर चाल द्या; पण ती चाल देत असताना तो कविता समजून घेण्याचाच एक मार्ग असतो हेच आपण नेमके विसरतो. त्यामुळे संगीत माहिती नसले, तरी ते कुतूहलाने ऐकण्याची तयारी ठेवा,’ असेही इनामदार यांनी नमूद केले. ‘सिंफनी’ हे पुस्तक पाश्चात्य संगीत सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाईल, असे सांगून त्यांनी अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांचे आभार मानले.

आपले आजोबा थोर व्हायोलीनवादक शंकरराव बिनीवाले यांची आठवण सांगून इनामदार यांनी केलेल्या भाषणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडात दाद दिली. या वेळी आयटी तज्ज्ञ दुष्यंत पाटील, अपूर्व देशमुख, आशिष पाटकर यांचा सत्कार करण्यात आला. 

‘पुस्तक पेठ’चे संचालक संजय जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. माधव वैशंपायन यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZOMBQ
Similar Posts
मनोविकास प्रकाशनतर्फे २९ जूनला चर्चासत्राचे आयोजन पुणे : ‘अर्थरचनेतील समस्यांवर अभ्यासपूर्ण भाष्य करणाऱ्या अच्युत गोडबोले लिखित ‘अनर्थ’ या पुस्तकानिमित्त मनोविकास प्रकाशनातर्फे एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र शनिवार, २९ जून रोजी सायंकाळी सहा वाजता टिळक रस्त्यावरील पद्मजी सभागृहात होईल,’ अशी माहिती ‘मनोविकास’चे संस्थापक अरविंद पाटकर यांनी दिली
‘केवळ ‘जीडीपी’ वाढायला हवा असे म्हणणे मूर्खपणाचे’ पुणे : संपूर्ण देशातील उत्पादनाचे अंतिम मूल्य म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी); मात्र यात विषमतेचा विचारच होताना दिसत नाही. जीडीपी वाढला, तर रोजगार वाढेल परिस्थिती सुधारेल हे साफ खोटे ठरत असून, आजही ६० ते ७० टक्के जनता ही दहा हजार रुपयांपेक्षाही कमी मासिक शुल्कात आपला परिवार चालवते. दहा टक्के जीडीपी
बुद्धाचा र्‍हाट उत्तम कांबळे यांचं पुस्तक ‘बुद्धाचा र्‍हाट’...
‘प्रत्यक्ष अनुभव व कामातून ज्ञानप्राप्ती ही रोजगारक्षमतेची किल्ली’ पुणे : ‘आज आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान आणि ठोकताळे यांवर आधारित शिक्षण दिले जाते मात्र रोज येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपली शिक्षण पद्धती तितकीशी सक्षम नसून, ती बदलत महात्मा गांधी यांची ‘नयी तालीम’ अर्थात प्रत्यक्ष कामातून अनुभूती व त्या अनुभूतीमधून ज्ञानाची प्रचीती याचे अनुकरण केले गेले पाहिजे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language